Wednesday, March 26, 2025

 चालकांनी दररोज म्हणावे असेमार्ग सुरक्षा श्लोक

     वाहनांनी गजबजलेले रस्ते हे राष्ट्रीय प्रगतीचे एक चिन्ह. वाहनात बसून प्रवास करताना, निरनिराळ्या प्रकारची वाहनेचालविताना मौज वाटते.

    असे असले तरी रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची भारतातील संख्या प्रचंड आहे. दरवर्षी सुमारे दीड लाख भारतीय रस्ते अपघातांत प्राणाला मुकतात. हे टाळण्यासाठी वाहतूक आणि वाहनविषयक नियम आणि कायदे यांची जशी गरज आहे तशीच त्यांचे पालन करण्याची आणि रस्त्यांवर वाहने चालविताना स्वयंशिस्त पाळण्याची वृत्ती आणि सवय प्रत्येक चालकाच्या अंगी बाणण्याचीही आवश्यकता आहे.

    सामान्यपणे भारतीय मनुष्य सश्रद्ध असतो. कित्येक मराठी वाहन चालक अभंग आणि श्लोक तोंडपाठ म्हणतात. मनुष्याच्या अंगी सत्प्रवृत्ती रुजविणाऱ्या या श्लोकांप्रमाणेच वाहनविषयक आवश्यक ती काळजी आणि खबरदारी घेण्याची सवय चालकांना लागावी यासाठी मुकुंद दत्तात्रय शेवडे यांनी ‘मार्ग सुरक्षा श्लोकहे छोटंसं पुस्तक लिहिलं आहे.    

    यातील काही श्लोक पहा:-

नियम पुढचा तू नको पंख लावू I

नको उडत जाऊ नको नित्य धावू II

नसे वाहनेही मजेचाच खेळ I

क्षणाची मजा धावुनि येई काळ II

नियम पुढचा न कराद्यपान I

नका हाकवू होऊनि धुंदभान II

जिथे बालवाडी दिसे मोठी शाळा II 

तिथे वाहना आवरा मोह टाळा II 

गाडीच्या दुरुस्ती देखभालीचं आवाहन करणारेही श्लोक यात आहेत….

सदा ठेवुया वाहना तंदुरुस्त I

करा स्वार गाडी फिरा दूर मस्त II

आणि मुलांवर जबाबदारीचा संस्कार करणारे श्लोकही आहेत पहा ….

मुले चालविती दुचाकी भनाट I

नसे ज्ञात जाता काय होते सुसाट II

लेखक : मुकुंद दत्तात्रय शेवडे                  (९४२२४२९६४९)

प्रकाशक :- अवेश्री प्रकाशन, रत्नागिरी

मूल्य :- २०/- रुपये

'वाहन मोडी'चे धोरण 

खरे म्हणजे 'व्हालंटरी व्हेईकल फ्लीट मॉडर्नायझेशन प्रोग्रॅम' असे त्या योजनेचे नांव आहे, पण 'स्क्रॅपिंग पॉलिसी' म्हणून तिचा बोलबाला झाला आहे आणि ही कल्पना नक्की काय आहे याबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता आहे. अधिकाधिक चांगल्या स्थितीतील वाहनांनाच रस्त्यावर उतरण्याची परवानगी देऊन रस्ते अधिक सुरक्षित आणि प्रदूषण मुक्त बनविणे हे भारत सरकारच्या 'वाहतूक आणि महामार्ग मंत्र्यालयाच्या या योजनेचे उद्दिष्ट आहे.

 'व्हालंटरी व्हेईकल मॉडर्नायझेशन प्रोग्रॅम' या लांबलचक नावातील शब्दांची आद्याक्षरांनी बनलेल्या 'व्हीव्हीएमपी' या लघुसंज्ञेने ही योजना ओळखली जाते. आपण त्याला 'वाहनमोडीचे धोरण' म्हणूया. या धोरणाची अंमलबजावणी केल्याने जुनी नव्हे तर जुनाट आणि तंदुरुस्त नसलेली वाहने मोडीत काढण्यासाठी एक अधिकृत व्यवस्था निर्माण करण्यात येईल. ही व्यवस्था कशा प्रकारे उभी राहील याचा मागोवा भारत सरकारच्या 'वाहतूक आणि महामार्ग मंत्र्यालया'च्या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे घेऊया.

 'वाहन मोडी'चे धोरण केवळ जुनी वाहने भंगारात काढण्यापुरते मर्यादित नाही. त्याची बरीच उद्दिष्टे आहेत. आयुर्मर्यादा आणि नोंदणीकाल संपलेली जवळजवळ एक कोटी वाहने मोडीत काढून प्रदूषण कमी करणे हे त्यातील पहिले आणि महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने साध्य करण्याच्या अन्य बाबी पुढीलप्रमाणे:-

रस्ते, प्रवासी आणि वाहनांची सुरक्षितता वाढवणे;

वाहनांच्या विक्रीला चालना देऊन या क्षेत्रात रोजगार निर्माण करणे;

इंधन कार्यक्षमता वाढवून वाहन मालकांवरील दुरुस्ती खर्चाचा भार हलका करणे;

सध्या अस्तित्वात असलेल्या असंघटित भंगार उद्योगाला सुव्यवस्थित आकार देणे, आणि;

• (पुनर्वापर तंत्राद्वारे) वाहन, पोलाद आणि इलेक्ट्रॉनिक उद्योग क्षेत्रासाठी स्वस्त कच्च्या मालाची उपलब्धता वाढविणे.

या धोरणाच्या अंमलबजावणीतून आकाराला येणारा उद्योग म्हणजे केवळ वाहने मोडून टाकण्याची 'भंगारक्षेत्रे' नसून वाहनांची तंदुरुस्ती तपासणारी स्वयंचलित केंद्रे (ऑटोमेटेड फिटनेस सेंटर्स) देशभर उभारणे हा त्या योजनेचा महत्त्वाचा भाग असेल. त्यामुळे कोणती वाहने तोडली जात आहेत अथवा गेली आहेत त्यांची रीतसर नोंद करण्याची सुविधा निर्माण होईल. परिणामी चोरीसारख्या मार्गाने मिळविलेली वाहने मोडून पैसा निर्माण करणे अशा गोष्टींना आळा बसेल. सध्या जुने वाहन भंगारात काढताना त्याची किंमत घासाघीस करून ठरविण्यात येते, नवी व्यवस्था आल्यानंतर वाहनाच्या उपयोगिता (निरुपयोगिता म्हणा हवे तर) निर्देशांकाच्या आधारे किंमत ठरविता येईल. दुसऱ्या शब्दांत, भंगार वाहनांच्या मूल्यांकनाचे प्रमाणीकरण केले जाईल. वाहने मोडीत काढण्याचे काम अधिकृत केंद्रांमध्ये होऊ लागले की सरकारला कररूपाने उत्पन्नही मिळेल.

 सरकारने 'स्क्रॅपिंग पॉलिसी' आणण्याची घोषणा केल्यापासून हे धोरण म्हणजे ठराविक काळ वापरल्यानंतर गाड्या भंगारात द्याव्या लागणार असा भीतीयुक्त गैरसमज अलगद वाहन धारकांमध्ये पसरला. परंतु 'वाहन जुने झाले म्हणून नव्हे तर ते तंदुरुस्त नसेल तर मोडीत काढायचे' अशा शब्दांत एकदा केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एकदा या धोरणावर भाष्य केले, त्याचा अर्थ नीट जाणून घेतला पाहिजे. गडकरी म्हणतात, "वाहनमोडीचे धोरण (व्हीव्हीएमपी) ही भारतातील रस्त्यांवर अधिकाधिक चांगल्या अवस्थेतील वाहनांचे अधिराज्य स्थापन करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. प्रोत्साहन आणि फेटाळणी यांचे सुयोग्य मिश्रण असणाऱ्या या धोरणातून अधिक सुरक्षित रस्ते आणि स्वच्छ हवा हे लाभ प्राप्त होतील."

 

वाहनांचे सध्याचे आयुर्मान :- व्यावसायिक वाहनांच्या तंदुरुस्तीची (फिटनेस) दर दोन वर्षांनी तपासणी होते आणि ती आठ वर्षांची झाल्यावर ही तपासणी दरवर्षी होते. या प्रवर्गातील वाहनांची नोंदणी त्यांच्या तंदुरुस्ती प्रमाणपत्राच्या वैधतेशी निगडित असते.

 खाजगी वाहनांची नोंदणी पंधरा वर्षांसाठी वैध असते. त्यानंतर नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी वैध तंदुरुस्ती प्रमाणपत्र अनिवार्य असते. नूतनीकरण पाच वर्षांसाठी होते.

स्वयंचलित तपासणीमध्ये वाहन उत्तीर्ण झाल्यास ते सार्वजनिक रस्त्यांवर वापरण्यास योग्य असल्याची मान्यता प्राधिकृत अधिकारी देतील. अनुत्तीर्ण वाहनाला ELV (एन्ड ऑफ लाईफ) ठरवून ते मोडीत काढण्यायोग्य मानले जाईल.

ही प्रक्रिया व्यावसायिक वाहनांसाठी पहिल्या आठ वर्षांनंतर दरवर्षी करावी लागेल आणि खाजगी वाहनांसाठी पंधरा वर्षांचा कालावधी संपल्यावर करावी लागेल. तपासणीत अनुत्तीर्ण झालेल्या वाहनांची फेरतपासणी करण्यासाठी अपील करण्याची तरतूद आहे, फेरतपासणीत उत्तीर्ण झालेल्या खाजगी वाहनाची नोंदणी पुढे पाच वर्षांकरिता चालू राहील.

 व्यावसायिक वाहनांचे दरवर्षी पासिंग करण्याची आणि खाजगी वाहनांची पुढच्या पाच वर्षांसाठी नोंदणी करण्याची  पद्धत यापूर्वीही होतीच, त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सक्षम अधिकारी तपासणी करत असत. यापुढे ही तपासणी स्वयंचलित उपकरणांद्वारे करण्यात येईल तसेच तपासणी आणि उत्तीर्ण वाहनांची नोंदणी याकरिता भराव्या लागणाऱ्या शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. हे शुल्क पुढीलप्रमाणे :-

पंधरा वर्षांपेक्षा जुन्या व्यावसायिक वाहनांसाठी

तपशील          वाहनाचा प्रकार    सध्याचे शुल्क नवीन शुल्क

तपासणी शुल्क हलके वाहन       ६००/-₹      ,०००/-₹   मध्यम मालवाहू/ प्रवासी वाहन   १,०००/-₹   ,३००/-

अवजड मालवाहू/ प्रवासी वाहन १,०००/-₹   ,३००/-

तंदुरुस्ती प्रमाणपत्र

(फिटनेस सर्टिफिकेट)हलके वाहन २००/-₹      ,५००/-₹   मध्यम मालवाहू/ प्रवासी वाहन   २००/-₹   १०,०००/-

अवजड मालवाहू/ प्रवासी वाहन १,०००/-₹   १२,५००/-

 खाजगी वाहनांसाठी सध्या नवीन आणि नूतनीकरण नोंदणी करण्यासाठी ६००/-शुल्क आकारले जाते, आता नवीन वाहनांचे नोंदणी शुल्क ६००/-एवढेच ठेवण्यात आले आहे, मात्र पंधरा वर्षांपेक्षा जुन्या खाजगी वाहनांच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठीचे शुल्क ५०००/-करण्यात आले आहे. नूतनीकरणाचे शुल्क पूर्वी ६००/-होते ते आता १०००/-करण्यात आले आहे आणि त्यासाठी स्वयंचलित उपकरणांद्वारे तपासणी करण्यात येईल.

 

वाहन मोडीत काढायचे म्हणजे नुकसान असे समजण्याचे कारण नाही, मोडीत काढणाऱ्यांना काही विशेष लाभ मिळतील. या धोरणामध्ये वाहनांच्या मोडीच्या किमतीचे प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. ही रक्कम साधारणपणे त्या प्रकारच्या नवीन वाहनाच्या शोरूममधील किमतीच्या ४ ते ६% असेल. वाहन मोडीत काढणाऱ्यांना राज्य सरकारने नव्या वाहनाच्या करामध्ये सूट देण्याचे निर्देशही आहेत. खाजगी वाहनांना २५% तर व्यावसायिक वाहनांना १५% सूट मिळेल. नव्या वाहनाच्या नोंदणी शुल्काची सवलत हाही एक लाभ आहे. मोडीत काढल्याचे प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांना खरेदीमध्ये पाच टक्के सवलत देण्याची सूचना वाहन उत्पादकांना देण्यात आली आहे.

 स्वयंचलित तपासणी केंद्रे (ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन्स- ATS) आणि नोंदणीकृत वाहनमोड सुविधा (रजिस्टर्ड व्हेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटी - RVSF) यांची उभारणी हा या धोरणाचा दुसरा महत्त्वाचा पैलू आहे. पहिल्या टप्प्यात देशात ७५ 'एटीएस' सुरू करण्यात येणार आहेत आणि देशभरात साडेचारशे ते पाचशे 'एटीएस' स्थापण्याचे उद्दिष्ट आहे.

शास्त्रशुद्ध पद्धतीने वाहने तोडण्याची ५० ते ७० केंद्रे (RVSF) येत्या चारपाच वर्षांत उभारण्यात येतील.

ही उभारणी PPP म्हणजेच सार्वजनिक- खाजगी - भागीदारी तत्त्वावर करण्यात येईल.

व्यावसायिक स्वयंचलित तपासणी केंद्रे नागरिक वैयक्तिक पातळीवर अथवा संघटित होऊन उभारू शकतात, राज्य सरकारे, कंपन्या उभारू शकतात. त्या केंद्रांमध्ये आवश्यक प्रमाणात प्रशिक्षित मनुष्यबळ असणे गरजेचे आहे, तसेच त्या ठिकाणी फक्त तपासण्या केल्या जातील, दुरुस्तीची कामे होणार नाहीत. पाच लाख रुपये अनामत आणि एकंदर साठ हजार रुपये नोंदणी शुल्क भरून असे सुसज्ज तपासणी केंद्र अधिकृतपणे नोंदविता येईल.

 वाहनमोडकेंद्राच्या उभारणीसाठी एक लाख रुपये प्रक्रिया शुल्क, दहा लाख रुपये अनामत तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता आणि दर्जाविषयक 'आयएसओ' प्रमाणपत्र आवश्यक ठरविले आहे.

 शास्त्रशुद्ध पद्धतीने वाहने तोडण्याची प्रक्रिया अधिकृत केंद्रांमध्ये केली जाईल, त्यामुळे बॅटरीसारख्या घटकांची विल्हेवाट लावताना उद्भवणारा धोका टाळणे शक्य होईल, तसेच स्वच्छता आणि पर्यावरणीय सुरक्षितता या गोष्टीही साध्य होतील. अशा ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि आरोग्य याबाबतही चांगले वातावरण निर्माण होईल अशी आशा बाळगता येईल.

 


Monday, August 16, 2021

 महिंद्रा XUV 700

   
  भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सुमुहूर्तावर 'महिंद्रा XVU 700' या नव्या आलिशान 'एसयूव्ही'चे अनावरण झाले. 12 ते 15 लाख रुपये किंमत गटात या गाडीची चार मॉडेले उपलब्ध आहेत.

      2 लीटर क्षमतेचे 200 पीएस (दर मिनिटाला 5000 फेऱ्यांत 147 किलोवॅट) शक्तीचे पेट्रोल इंजिन 1750 ते 3000 फेऱ्यांमध्ये 380 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. हे डायरेक्ट इंजेक्शन टर्बो इंजिन आहे.

       दर मिनिटाला 3750 फेऱ्यांमध्ये 155 पीएस (114 किलोवॅट) शक्ती/ 360 न्यूटन मीटर टॉर्क (1500-2800 फेरे) आणि 3500 फेऱ्यांमध्ये 185 पीएस (136 किलोवॅट) शक्ती/ 420 न्यूटन मीटर टॉर्क (1600-2800 फेरे) 2.2 लीटर क्षमतेचे सीआरडीआय डिझेल इंजिन हा पर्यायही निवडता येतो.

          दोन्ही प्रकारच्या इंजिनांसोबत मॅन्युअल किंवा स्वयंचलित गिअरबॉक्स मिळू शकतात, दोन्ही सहा गतींचे आहेत.

          पुढे आणि मागे स्वतंत्र सस्पेंशन, पुढे व्हेंटिलेटेड आणि मागे सॉलिड डिस्क ब्रेक आणि 60 लीटर क्षमतेची इंधन टाकी असलेल्या या गाडीची स्टेपनी 'तात्पुरत्या' प्रकारातील आहे.

          या गाडीमध्ये चालकाला साहाय्य करण्यासाठी पुरविलेल्या यंत्रणा (Adaptive Driver Assist System - ADAS) वैशिष्ट्यपूर्ण आहेत. चटकन गती कमी करण्यासाठी क्रूझ कंट्रोल, पुढून दिव्याचा झोत पडताच आपोआप खाली झुकणारी 'लो बीम' आणि रस्त्याशेजारच्या वाहतूक चिन्हावर रात्रीच्या वेळी उजेड पाडणारा खास झोत या यंत्रणेत आहे.

         सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरविलेल्या ऐच्छिक सुविधा महत्त्वाच्या वाटतात. यामध्ये 'इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम (ESP) आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक यांचा समावेश आहे. या गाडीमध्ये पुढे दोन, दोन्ही बाजूंना दोन-दोन आणि चालकाच्या गुढघ्यासमोर एक अशा सात एअर बॅगची सुविधाही मिळू शकते. पुढे आपटून होणाऱ्या अपघाताची सूचना देणारी यंत्रणा चालकाला सावध करण्यास उपयुक्त ठरेल.

        पांच आसनी गाडीच्या मॉडेलनुसार शोरूम किमती

MX पेट्रोल इंजिन       11.99 लाख रुपये

MX डिझेल इंजिन      11.99 लाख रुपये

AX 3 पेट्रोल इंजिन     11.99 लाख रुपये

AX 5 पेट्रोल इंजिन     11.99 लाख रुपये



Friday, August 13, 2021

 स्क्रॅपिंग पॉलिसी' आहे तरी काय?

जुनी वाहने मोडीत काढण्याचे धोरण केंद्र सरकारने यापूर्वीच जाहीर केले आहे. त्याबाबत ज्या बातम्या प्रसृत झाल्या त्यांतून प्रामुख्याने पुढील बाबी सामान्य जनतेला ठाऊक झाल्या:-

पंधरा वर्षांनी व्यावसायिक वाहनांची नोंदणी रद्द होणार

खाजगी वाहनांना मोडीत काढणे ऐच्छिक

वाहनांच्या फिटनेस तपासणीची केंद्रे उभारणार

हे धोरण येणार याबद्दल जवळजवळ दोन वर्षे चर्चा सुरू होती, या वर्षी त्याची आखणी झाली आहे, आणि ऑक्टोबर महिन्यात त्याची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी या धोरणाबाबत जनतेकडून सूचना मागविल्या जातील. या धोरणाचे स्वरूप कसे आहे ते थोडक्यात जाणून घेऊया.

            'व्हेइकल स्क्रॅपिंग पॉलिसी' म्हणून चर्चेचा विषय झालेल्या या धोरणाचे नांव आहे 'व्हॉलंटरी व्हेइकल मॉडर्नायझेशन प्रोग्रॅम' (VVMP). जुनी वाहने आधुनिक वाहनांपेक्षा दहा बारा पट जास्त प्रदूषण करतात. त्यामुळे वाहतूक सुरक्षेला धोका निर्माण होतो, पर्यावरण, वाहन वापरणारे आणि पादचारी यांच्या सुरक्षिततेचा विचार या धोरणाच्या मुळाशी आहे. 'अक्षम (अनफिट) आणि प्रदूषणकारी वाहने बाद करणारी व्यवस्था निर्माण करणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भविष्यातील परिस्थितीचा वेध घेऊन नेटाने हे धोरण आखले आहे.

            याद्वारे अस्तित्त्वात येणाऱ्या वाहन- तोड उद्योगात दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. तसेच सुमारे पस्तीस हजार रोजगार संधी निर्माण होतील. यानुसार वाहने मोडीत काढण्याचे ठरविण्यासाठी 'स्वयंचलित वाहन तंदुरुस्ती तपासणी केंद्रे' (ऑटोमेटेड व्हेइकल फिटनेस सेंटर्स'कडून होणारी चाचणी आणि परिवहन अधिकाऱ्यांनी नोंदणीचे नूतनीकरण नाकारणे या दोन बाबींचा प्रामुख्याने आधार असेल. युनायटेड किंगडम (इंग्लंड), अमेरिका, जर्मनी आणि जपान या देशांतील अशा प्रकारच्या धोरणाचा अभ्यास करून आपल्याकडील धोरण आखले आहे.

            धोरण अंमलबजावणी सुरू  झाल्यावर वाहन अक्षम (अनफिट) असल्यास त्याची नोंदणी रद्द होईल. खाजगी वाहनांच्या नोंदणीचे नूतनीकरण होताना, त्यातून बाहेर येणारा धुराचा पर्यावरणावरील परिणाम आणि ब्रेकची कार्यक्षमता या मुख्य बाबींसह 'केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 1989' मधील तरतुदींचा आधार घेण्यात येईल.

            सामान्यपणे पंधरा वर्षांनी वाहनांची नोंदणी रद्द होईल. खाजगी वाहनाबाबत ही मुदत वीस वर्षे असेल, मात्र पहिल्या पंधरा वर्षानंतर नोंदणीचे नूतनीकरण त्या वाहनाच्या स्थितीवर अवलंबून असेल. जुनी वाहने वापरण्यापासून त्यांच्या मालकांना परावृत्त करण्यासाठी नूतनीकरण शुल्कात वाढ करण्याचा मार्ग विचाराधीन आहे. सरकारी वाहनांचा पंधरा वर्षांनंतर नूतनीकरण न करण्याचा विचारही करण्यात आला आहे.


जुनी वाहने मोडीत काढण्यास प्रोत्साहन देण्यासाठी 'इंसेंटिव्ह'ची योजनाही यात समाविष्ट आहे. नव्या वाहनाच्या किमतीत पांच टक्के सूट तसेच नोंदणी शुल्क आणि रस्ता कर (रोड टॅक्स) यामध्ये सवलत हा 'इंसेंटिव्ह'चा भाग असेल.

            देशात अनेक ठिकाणी आधुनिक पद्धतीची 'वाहन-तोड केंद्रे'  सुरू करण्यात येतील. ती खाजगी व्यावसायिकांकडून चालवली जातील. या केंद्रामध्ये वाहनांची चाचणी घेऊन सक्षमता तपासण्याची सुविधा असेल, मात्र वाहनांची दुरुस्ती आणि त्यांच्या सुट्या भागांची विक्री करता येणार नाही. प्रशस्त जागेत ही केंद्रे उभारली जातील, तेथे वाहने उभी करण्यासाठी पुरेशी पार्किंग जागा, वाहनांच्या हलचालीस पुरेशी मोकळीक मिळेल इतपत जागा आवश्यक असेल. मोडीत काढलेल्या गाड्या तोडून त्यांचे धातूचे तसेच इलेक्ट्रॉनिक घटकभाग वेगळे करून पुनर्वापराठी आवश्यक प्रक्रिया केली जाईल. ही केंद्रे वाहन तोडीच्या आधुनिक यंत्रसामुग्री व उपकरणांनी सुसज्ज असतील.

 

 


Tuesday, June 15, 2021

खाजगी गाडी ठरू शकते 'सार्वजनिक'

आपल्या खाजगी मोटारीमध्ये आपण कसेही वागू शकतो अशी कोणाची समजूत असेल तर ती पूर्णपणे खरी मानता येणार नाही. स्वतःच्या मोटारीत बसून अथवा प्रवास करताना केलेले कृत्य स्वतःखेरीज इतरांना त्रासदायक अथवा हानिकारक ठरणारे असेल तर ते 'सार्वजनिक ठिकाणी' केलेले कृत्य समजून शासनातर्फे त्याला प्रतिबंध केला जाऊ शकतो. भारतातील काही उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या काही निर्णयांवरून हे स्पष्ट झाले आहे.

आपण खरेदी केलेली मोटारगाडी किंवा वाहन हे आपल्या मालकीचे असते, आपल्या परवानगीशिवाय अन्य कोणी त्याचा वापर करू शकत नाही हे खरे असले तरी तेच वाहन सार्वजनिक जागेत चालत अथवा उभे असताना त्याचाही समावेश 'सार्वजनिक जागां'मध्ये होऊ शकतो. किंबहुना त्या वाहनाच्या मालकाने सार्वजनिक हिताला बाधा येईल असे कृत्य केल्यास 'आपण ते आपल्या गाडीत बसून केल्यामुळे आपण निर्दोष आहोत', असे समर्थन त्याला करता येणार नाही. 

           गेल्या वर्षाच्या प्रारंभीच पसरू लागलेल्या 'कोरोना' या साथीच्या विकारापासून दूर राहण्यासाठी वैयक्तिक पातळीवर मुखपट्टी (मास्क) वापरणे हा एक प्रभावी उपाय मानला गेला आहे. सार्वजनिक स्थळी मास्कचा वापर अनिवार्य करणारे शासकीय आदेश देशातील सर्वच राज्यांनी प्रसृत केले आहेत. ते न पाळणाऱ्यास दंड करण्यात येतो. 'दिल्ली डिझास्टर मॅनेजमेंट ऑथारिटी (DDMA)'नेही अशा प्रकारचा आदेश काढला होता.  दिल्लीतील एका वकिलाला स्वतःच्या कारमधून विनामास्क प्रवास केल्याबद्दल 500 रुपये दंड ठोठावण्यात आला. वकील महाशयांनी DDMA च्या विरोधात दाद मागण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आणि दंडाची रक्कम परत मिळावी तसेच दहा लाख रुपये भरपाई मिळावी अशी मागणी केली. मात्र न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली.
             'सौरभ शर्मा विरुद्ध उपविभागीय दंडाधिकारी व अन्य' या नांवाच्या या खटल्याचा निकाल देताना दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी केलेले स्पष्टीकरण प्रत्येक वाहन चालकाने जाणून घेण्याजोगे आहे. सध्याच्या साथरोगाच्या वातावरणाचा विचार करता 'खाजगी वाहन' हेदेखील रोगाचा प्रसार करण्यास कारण ठरू शकते म्हणून त्यालाही 'सार्वजनिक जागा' समजणे आवश्यक बनले आहे. हा निर्णय देताना न्यायमूर्तींनी बिहार उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेला एक निकाल तसेच '(परिस्थितीच्या) अनिवार्यतेच्या तत्त्वा'चा आधार घेतला आहे.
             मास्क न घालता गाडी चालविल्याबद्दल दंड ठोठावला गेलेल्या वकिलाने आपली बाजू मांडताना पुढील मुद्द्यांचा आधार घेतला:-
1. आपण प्रवास करत असलेले वाहन आपल्या मालकीचे असल्याने ते 'खाजगी क्षेत्र' (प्रायव्हेट झोन) आहे;
2. गाडीत आपल्याखेरीज दुसरी कोणी व्यक्ती नव्हती;
3. 'केंद्र सरकारने असे कोणतेही आदेश दिले नाहीत,' असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्पष्ट केले होते.
             दिल्ली सरकारने म्हणणे मांडताना 'खाजगी वाहन हे सार्वजनिक रस्त्यावर असताना 'खाजगी क्षेत्र' असत नाही, किंबहुना ते सार्वजनिक स्थळ असते असे प्रतिपादन केले. याच्या पुष्ट्यर्थ 'सतविंदरसिंग सलुजा व इतर विरुद्ध बिहार सरकार' या खटल्याच्या निकालाचा आधारही घेतला. या खटल्यात स्वतःच्या गाडीत बसून मद्यपान करून वाहन चालविल्याबद्दल गुन्हा दाखल झालेल्यांनी 'आपले वाहन ही खाजगी मालमत्ता' असल्याचे प्रतिपादन केले होते. दंडात्मक कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान दिल्यावर त्यांचा दावा फेटाळण्यात आल्याने ते सर्वोच्च न्यायालयात गेले. तेथेही अपील फेटाळून लावले.
             त्यावेळी न्यायमूर्तींनी सांगितले की खाजगी वाहनात प्रवेश करण्याचा अधिकार इतर व्यक्तींना नसेल हे खरे असले तरी अशा वाहनांपर्यंत पोहोचण्याची संधी लोक साधू शकतात. 'पब्लिक ऍक्सेस' या शब्दाचा व्यापक अर्थ यानिमित्ताने त्यांनी स्पष्ट केला. त्यानुसार
• अधिकार / हक्क, संधी, शिरकाव करण्याची क्षमता
• तेथपर्यंत पोहोचणे, तेथून येणे किंवा जाणे, संवाद साधणे
यांपैकी कोणतेही कृत्य खाजगी वाहन सार्वजनिक रस्त्यावर असताना घडू शकते. या निर्णयाचा आधार घेत वकील महाशयांचा अर्ज फेटाळून लावताना न्यायमूर्ती प्रतिभा सिंग यांनी म्हटले, "मास्क हा कोरोना विषाणूच्या प्रसाराला रोखण्याचे काम एखाद्या सुरक्षा कवचासारखा करतो. तो लावणाऱ्या आणि संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचेही संरक्षण मास्क करतो. या उपायाने लक्षावधी लोकांचे प्राण वाचले आहेत."
               एखादा मनुष्य मास्क न लावता आपल्या मोटारीतून एकटाच प्रवास करत असेल, आणि तो बाधित असेल तर त्याच्या शरीरातून विषाणूंचा समावेश असलेल्या द्रवाचे कण बाहेर पडून गाडीत पसरलेले असू शकतात. त्यांचा संसर्ग नंतर त्या वाहनाशी संपर्क आलेल्यांना होऊ शकतो. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने DDMA चा आदेश योग्य असल्याचा निर्वाळा दिला.
               या खटल्यात न्यायालयाने '(परिस्थितीच्या) अनिवार्यतेचे तत्त्व'देखील स्पष्ट केले.  'एरवी ज्या विषयांमध्ये कायद्याने लक्ष देण्याची फारशी गरज नसते अशा गोष्टींमध्ये परिस्थितीनुसार हस्तक्षेप करून सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचा प्रशासनाला अधिकार असतो, तो घटनात्मक मानला जातो.
           . 'लॉ कॉर्नर' या संकेतस्थळावर वरील खटल्याची हकीकत मुंबईतील 'प्रवीण गांधी कॉलेज ऑफ लॉ'च्या आयुष मित्र या विद्यार्थ्याने तपशीलवार लिहिली आहे. तिचा समावेश करताना त्यांनी म्हटले आहे, "कायद्याचा चुकीचा अर्थ लावणे आणि त्यातील पळवाटा शोधणे याऐवजी या राष्ट्रीय आपत्तीला तोंड देण्यासाठी आपण प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. योग्य त्या नियमांना आव्हान देण्याच्या प्रयत्नामुळे घातक पायंडे पडण्याचा धोका उद्भवू शकतो." सार्वजनिक कर्तव्य म्हणून वाहनधारकांना ही माहिती मार्गदर्शक ठरेल.

Featured Post

  चालकांनी दररोज म्हणावे असे ‘ मार्ग सुरक्षा श्लोक ’       वाहनांनी गजबजलेले रस्ते हे राष्ट्रीय प्रगतीचे एक चिन्ह. वाहनात बसून प्रवा...