Sunday, November 24, 2019

'फास्ट टॅग' काय आहे?


एक डिसेंबरपासून सर्व वाहनांना 'फास्ट टॅग' अनिवार्य करण्यात येणार आहे. हा टॅग बसविलेल्या (स्टिकर चिकटवलेल्या) वाहनांना महामार्ग अथवा अन्य रस्त्यांवरील टोल नाक्यावरून जाताना थांबून बुथवर पैसे भरावे लागणार नाहीत, त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्गिका असेल आणि नाका ओलांडून जातं त्यांच्या बँकेतील खात्यावरून परस्पर टोलची रक्कम वळती केली जाईल. १ डिसेम्बरपासून टॅग नसलेली वाहने टोलनाका ओलांडतील तेव्हा त्यांच्याकडून निर्धारित टोलआकाराच्या दुप्पट रक्कम वसूल करण्यात येईल. टोलनाक्यापासून दहा किलोमीटर परिघात राहणाऱ्या वाहनधारकांना टोलच्या शुल्कामध्ये सवलत मिळू शकेल, त्यासाठी वास्तव्याचा पुरावा सादर करावा लागेल. हे काम महामार्ग प्राधिकरणामार्फत होईल.

'फास्ट टॅग' हा विशिष्ट प्रकारचा स्टिकर असतो. बँकेत खाते उघडल्यावर 'एटीएम' कार्ड मिळते तेव्हा दिले जाते तसे कागदपत्रांचे एक किट 'फास्ट टॅग' म्हणून देण्यात येते.  त्यामध्ये एक फॉर्म, माहितीपत्र आणि स्टिकर यांचा समावेश असतो. हे किट बँकेतून घेता येईल. त्यासाठी बावीस बँका नियुक्त करण्यात आल्या आहेत.  यांपैकी बहुतेक बँक कॉर्पोरेट क्षेत्रातील असून ग्रामीण भागातील वाहनधारकांना 'स्टेट बॅँके'तून हे किट घेता येईल. (बँकांची यादी )  यामध्ये बँका फक्त किट पुरविण्याचे कामकारतील आणि एरवी 'बँक न्यूट्राल' तत्त्वावर हा व्यवहार होईल. म्हणजेच ग्राहकाने घेतलेल्या किटमधील फास्ट टॅग त्याचा त्याला रिचार्ज करता येईल. साधारणपणे चारशे रुपयांत किट मिळेल, मात्र काही बँकांनी प्रथम रिचार्ज रकमेसह थोडी वाढीव किंमत ठेवली आहे.

टॅग खरेदी केल्यावर अँड्रॉइड फोनकरिता 'गूगल प्ले स्टोअर'मधून आणि आय फोन करीत 'ऍपल स्टोअर'मधून आप डाउनलोड करता येतील. त्यामध्ये पैसे जमा करून ठेवल्यावर तोल नाक्यावरून जाताना ते आपोआप वळते होतील. बँकेतून किट घेण्यासाठी 'केवायसी'बरोबर वाहनाच्या नोंदणीची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. मर्यादित  केवायसी खात्यात जास्तीत जास्त २०,०००/- आणि पूर्ण केवायसी  खात्यात जास्तीत जास्त १,००,०००/- रुपये ठेवता येतील. टोल नाक्यावरून जाण्यापूर्वी खात्यात पुरेशी रक्कम असल्याची खात्री करणे ही वाहन धारकाची जबाबदारी राहील. एक फास्ट टॅग एकाच वाहनाला वापरता येईल, म्हणजेच प्रत्येक वाहनाचा टॅग स्वतंत्र असेल.

'फास्ट टॅग' योजनेचे फायदे 


  • टोल नाक्यावर वेळेची बचत 
  • वाहने न थांबता गेल्याने इंधन बचत
  • पारदर्शक आर्थिक व्यवहार 
  • सुट्या नाण्याअभावी होणारी लूट थांबेल 
  • रोकडविरहित देवघेव, कागदाची बचत 
याप्रमाणे फायदे असले तरी या योजनेतून निर्माण होणाऱ्या तात्कालिक समस्यांचाही विचार केला पाहिजे. जेमतेम एका आठवड्यावर आलेल्या १ डिसेंबर पासून टॅग अनिवार्य केल्याने बँकांमध्ये झुंबड उडेल. सर्वच शाखांमध्ये टॅग उपलब्ध असतील  असे नाही त्यामुळे ग्राहकांची निराशा संभवते. विशेषतः ग्रामीण भागात हा त्रास होऊ शकतो.  टॅग घेण्याची तयारी असूनही वेळेवर उपलब्ध न झाल्यास अकारण दुप्पट टोल भरावा लागेल. सर्व वाहनांना टॅग बसेपर्यंत टोलनाकी चालवणाऱ्या कंत्राटदारांची चंगळ होईल. अशावेळी सुट्या पैशाची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते. 

Monday, November 11, 2019

"विद्युत वाहनं हा मुख्य प्रवाह बनणार नाही"

'होंडा'च्या सीईओचं मत        स्वत:च्या उत्पादनात 'हायब्रीड'वर भर 



विजेवर चालणाऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या वाहनांचा प्रसार जगभर वाढत आहे. जवळजवळ सर्व मोटार उत्पादकांनी विजेवर चालणारी वाहनं विकसित केलीत. जनरल मोटर्स, फोर्ड, टोयोटा, ह्युंदाई स्कॅनिया अशा नामवंत मोटार कंपन्यांनी विद्युत वाहनं आणि विद्युत वाहतुकीसाठी आवश्यक असणारी तांत्रिक संरचना यांच्या संशोधनासाठी मोठमोठ्या प्रयोगशाळा उभारल्यास. तरीसुद्धा विद्युत वाहनांचा वापर हा मोटार वाहतुकीतील प्रमुख सूत्र (main stream )बनू शकणार नाही, असं मत जगप्रसिद्ध 'होंडा' कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ताकाहिरो हाचिगो यांनी व्यक्त केलाय. 

"विद्युत बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांनी सर्व वाहतूक व्यापली जाईल हे मला मान्य  नाही," असं म्हणून हचिगो यांनी कधीकाळी पूर्णतः विद्युत वाहतूक अस्तित्त्वात येईल ही समजूत खोडून काढली आहे. संरचना, घटक भागांची निर्मिती, उपलब्धता आणि किंमत तसंच सुरक्षेवर करावयाच्या खर्चाची मर्यादा वगैरे बाबींचा साकल्याने विचार करून त्यांनी हे मत बनवलंय.  देशोदेशीची परिस्थिती आणि कायदेकानू भिन्न असतात. जगभर सर्वत्र चालकविरहित वाहनं सर्वकाळ फिरतील ही कल्पनाही एका मर्यादेच्या आत राहील असं त्यांना वाटतं.
आपल्या वाहनांचं विद्युतीकरण करण्याचं धोरण आखताना 'होंडा'ने पेट्रोल इंजिन आणि विद्युत मोटार असणाऱ्या 'हायब्रीड' वाहनांच्या निर्मितीवर भर देण्याचं ठरवलंय. २०३० पर्यंत या प्रकारची वाहनं प्रचारात आणणं हे कंपनीचं उद्दिष्ट आहे. 

विजेवर चालणाऱ्या दोन चाकी वाहनांची भारतीय मोटरपेठेत चलती

 विजेवर चालणाऱ्या दोन चाकी वाहनांचा झपाट्याने प्रसार होऊ लागलाय.   ‘बजाज चेतक’ पुढील वर्षी मोटारपेठेत येत असली तरी या प्रकारच्या गाड्या तयार करणाऱ्या नव्या   आणि अपरिचित कंपन्यांनी भारतीय मोटारपेठेत बस्तान बसवणं सुरु केलंयपूर्वीच्या जमान्यात बजाज स्कूटरची स्पर्धक असणारी ‘लॅम्ब्रेटा‘ देखील विजेची शक्ती वापरून  भारतीय रस्त्यांवरून पळण्याच्या  तयारीत आहे. 
       नव्या आणि अनोळखी नावांच्या बऱ्याच दोनचाकी उत्पादकांचा भारतातील व्यवसाय तेजीत चालू लागला आहे.  २०१९ साली तुन्वालनावाच्या उत्पादकाने सात प्रकार बाजारात उतरविले आहेत, त्यांमध्ये दिव्यांगांसाठी तीन चाकी वाहनाचंही एक मॉडेल आहे.  स्पोर्ट 63’, ‘स्टॉर्म Zx’, इलेक्ट्रिका 48’, लिथिनो Li’ अशी त्यांची नावं आहेत. आणि व्होल्टेज क्षमतेप्रमाणे त्यांच्यात कमीजास्त शक्तीच्या गाड्या आहेत.
       या गाड्यांमध्ये लेड असिड आणि लिथियम आयन अशा दोन्ही प्रकारच्या बॅटऱ्या वापरल्या आहेत, लिथियम आयन बॅटरी असलेली मॉडेलं अधिक शक्तिशाली आहेत. लेड असिड बॅटरीची दोन  वर्षाची आणि लिथियम आयन बॅटरीची एका वर्षाची वारंटी आहे. मागच्या चाकांच्या बसविलेल्या विद्युत मोटारीमुळे वेग घेणाऱ्या या दुचाक्या विशिष्ट स्विच दाबून 'लो' किंवा 'हाय' गतीमध्ये पळवता येतात. 'लो मोड' शहरातील गर्दीच्या रस्त्यांवर तर 'हाय मोड' मोकळ्या रस्त्यावर उपयोगी आहे. या गाड्यांच्या शक्तीप्रमाणे त्या एका चार्जिंगमध्ये ७० ते ८५ किमी अंतर कापतात, त्यांपैकी इलेक्ट्रिका 48  ही  मोपेडसदृश बाईक एका चार्जमध्ये तब्ब्ल १०० किमी जाईल असा उत्पादकांचा दावा आहे. 
        वेगवेगळ्या सहा रंगछटांमध्ये मिळणाऱ्या या गाडयांना पुढे डिस्क ब्रेक, सीटखाली हेल्मेट राहील एवढी जागा, हॅण्डलच्या खालच्या भागात विंडशील्डच्या मागे ग्लोव्ह बॉक्स, अलार्मसह रिमोट चावी आणि मागचं चाक 'लॉक' करण्याची सुविधा पुरविली आहे. महिला, महाविद्यालयीन युवती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही गाडी अतिशय सोयीस्कर आहे, असं रत्नागिरीतील विक्रेत्या 'यशराज मोटर्स'च्या संचालिका सलोनी बने यांनी सांगितलं.

Saturday, November 9, 2019

मोटार वाहतूक हे तसं विविध विषयांना स्पर्श करणारं क्षेत्र. पर्यटन हे त्यातलं एक. आपल्या करिअरचा केटरिंग आणि हॉटेल व्यवसायाने प्रारंभ करणारे रत्नागिरीचे दोन युवा उद्योजक कौस्तुभ सावंत आणि सुहास ठाकुरदेसाई यांनी कोकण किनाऱ्यावरचा हा रम्य प्रदेश पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आणण्यासाठी आपल्या व्यावसायिक पातळीवर अभिनव प्रयत्न केले. रम्य सागरकिनारा नि पाहण्यासारखी बरीच ठिकाणं असूनही रत्नागिरीस पर्यटक थांबत नाहीत ही या उद्योजक जोडगोळीला वाटणारी खंत होती आणि ती दूर करण्यासाठी त्यांनी पद्धतशीर व्यावसायिक योजना आखली. व्यावसायिकता आणि नैतिकतेची सुरेख सांगड घालत या दोघांनी हॉटेल आणि पर्यटन उद्योगात मिळविलेल्या यशाबद्दल नुकतीच त्यांची 'मुंबई दूरदर्शन'च्या 'सह्याद्री' वाहिनीवर मुलाखत झाली.
    "पर्यटन हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा उद्योग आहे," सुहास ठाकुरदेसाई मुलाखतीत सांगत होते "महाराष्ट्र हे नैसर्गिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक लेणं आहे. पर्यटनाचा पाहिजे तेवढा विकास राज्यात झाला नाही, केरळ, गोवा, राजस्थान यांची अर्थव्यवस्था पर्यटनावर उभी आहे.  रत्नागिरी हा सांस्कृतिक, पारंपरिक, धार्मिक, ऐतिहासिक, नैसर्गिक आणि खाद्यपदार्थ अशा सर्व प्रकारच्या पर्यटनाला अनुकूल असा एकमेव जिल्हा आहे, पण पर्यटन विकास झाला नाही. सरकार विकास करील असं म्हणत वाट पाहण्यापेक्षा व्यवसाय करताना पर्यटन वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले."
    दूरदर्शन निवेदिका नेहा परांजपे यांनी घेतलेल्या या पाऊण तासाच्या मुलाखतीत सुहास आणि कौस्तुभ या दोघांनाही आपल्या वाटचालीचा सविस्तर परामर्श घेता आला. कौस्तुभ सावंत म्हणाले, "रत्नागिरी शहरानजीक गणपतीपुळे हे प्रसिद्ध स्थळ आहे, तिथे येणाऱ्या पर्यटकांना या शहराकडे आकर्षून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. 'हर्षा हॉलिडेज' या नावाची पर्यटन सेवा सुरू केली. पर्यटकांना पाहण्यासारखं रत्नागिरी शहरात बरंच आहे, पण अनेकांना माहिती नाही. सर्वांना खुलं असलेलं पतितपावन मंदिर, लोकमान्य टिळकांची जन्मभूमी, स्वा. सावरकरांना काही काळ ठेवलं होतं ती मध्यवर्ती कारागृहातील कोठडी, त्यांचं वास्तव्य असणारं घर, थिबा राजवाडा, रत्नदुर्ग किल्ला अशी ऐतिहासिक ठिकाणं आहेत, सगळी पहायची तर दोन दिवस पुरणार नाहीत."
   रत्नागिरी हे पर्यटकांच्या वास्तव्याचं ठिकाण झालं पाहिजे
, इथून आसपासची प्रेक्षणीय स्थळं दाखवता येतील. या उद्योजकांनी रत्नागिरीचं ऐतिहासिक रूप दाखविण्यासाठी 'हेरिटेज वॉक'ची योजना तयार केलीय, इथल्या समुद्र किनाऱ्यावर 'स्कुबा डायव्हिंग' अर्थात पाण्याखालील संचाराचा आनंद पर्यटकांना मिळवून देण्यासाठी तो उपक्रम सुरू केला, कौस्तुभचे भावोजी महेश शिंदे ती आघाडी सांभाळतात. पर्यटन विकासाकरिता सक्रिय योगदान देण्याचं हे एक साहसच, या साहसाला सलाम.


Wednesday, November 6, 2019

सीएनजी वाहनविषयक प्रदर्शन ६ डिसेंबर रोजी नवी दिल्लीत

   
नैसर्गिक वायू (CNG)हे इंधन वापरून चालणाऱ्या वाहनांचा वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून प्रसार होण्याचे उद्दिष्ट ठेवून ६ डिसेंबर २०१९ रोजी 'नॅचरल गॅस व्हेईकल कन्क्लेव्ह २०१९' हे प्रदर्शन नवी दिल्ली येथे भरणार आहे. ETAuto.com  या मोटार उद्योगविषयक माध्यमातर्फे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदूषण टाळून मोटारगाड्यांना शक्तीपुरवठा करणाऱ्या इंधनांशी संबंधित विविध प्रकारच्या माहितीचे आदानप्रदान या प्रदर्शनात करण्यात येईल. 
            दिवसभर आठ तास चालणाऱ्या या प्रदर्शनात नैसर्गिक वायू या इंधनाशी संबंधित विविध बाबींचे तज्ञ विचारविनिमय आणि मार्गदर्शनात सहभागी होतील. एकूण ५ सत्रे व प्रदर्शन दालने असून दोनशेहून अधिक वरिष्ठ औद्योगिक अधिकारी या प्रदर्शनासाठी उपस्थित राहतील. या प्रदर्शनाच्या  निमित्त्ताने पुढलं विषयांवर उद्बोधक चर्चासत्रे आयोजित केली आहेत. त्यांमध्ये चर्चिले जाणारे विषय पुढीलप्रमाणे असतील - 

  • नैसर्गिक वायूवर चालणारी वाहने - वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून योग्य पर्याय;
  • नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या वाहनांमधील नवे तंत्रज्ञान, वायूची साठवणूक आणि इंधन पुरवठ्याचे मार्ग;
  • नागरी टॅक्सी सेवा - नैसर्गिक वायूवरील वाहनांचे अग्रदूत;
  • नैसर्गिक वायूवरील वाहनांची सुरक्षितता आणि प्रमाणीकरण 
           पेट्रोलियम इंधनांवरील प्रचंड खर्चात कपात करणे आणि खनिज तेलांच्या ज्वलनाने होणारे प्रदूषण कमी करणे या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी भारत सरकारने १२०० अब्ज (१ लाख २० हजार कोटी) रुपये खर्चाची गुंतवणूक असणारी गॅस इंधन पुरवठा संरचना करण्याची योजना आखली आहे. २०३० पर्यंत देशातील जवळजवळ ३०० जिह्यांमध्ये ही संरचना उभी राहील. दाबयुक्त नैसर्गिक वायू (CNG) आणि द्रवीय नैसर्गिक वायू (LNG) यांचा वाहनांना सुरळीत पुरवठा करता यावा यासाठी देशभर १५ हजार इंधन पम्प सुरु करण्यात येतील. पाच वर्षांपूर्वी देशात या प्रकारचे केवळ ९३८ पम्प होते, सध्या त्यांची संख्या १७६९ आहे. 
           विजेवर चालणारी वाहने वायूचे प्रदूषण टाळण्यास अत्यंत उपयुक्त असली तरी त्यांच्यासाठी आवश्यक ती पायाभूत संरचनेतील उणीवांचा विचार करता प्रदूषणविरहित वाहतुकीसाठी वायूवर चालणारी वाहने हा समर्पक पर्याय असल्याचे 'ETAuto.com  या माध्यमाचे म्हणणे आहे. १ एप्रिल २०२० पासून मोटरपेठेत येणाऱ्या सुधारित बीएस ६ वाहनांना लागणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या किमतीच्या तुलनेने नैसर्गिक वायू हे इंधन स्वस्त पडेल. या बाबी ध्यानात घेऊन अधिकाधिक देशवासियांपर्यंत नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या वाहनांची माहिती पोहोचावी आणि प्रदूषणविरहित वाहतुकीसंबंधी नागरिकांचे प्रबोधन व्हावे याकरिता हे एका दिवसाचे प्रदर्शन उपयुक्त ठरेल.
          या प्रदर्शनासंबंधीचे वृत्तांत 'मोटार जगत'चे छापील अंक आणि या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.  

Featured Post

 महिंद्रा XUV 700       भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सुमुहूर्तावर 'महिंद्रा XVU 700' या नव्या आलिशान 'एसयूव्ही'...